Monday, October 22, 2012

पुनर्जन्म........!!


                        पुनर्जन्म........!!
Anjali When she was 2 years Old 
पुनर्जन्म........!! एक कपोलकल्पित,आभासी,रहस्यमयी आणि विलक्षण संकल्पना म्हणून आधीही आणि आजही चवीने चर्चिला जाणारा विषय आहे. पुढेही ह्यावर वादविवाद,तर्कवितर्क आणि चर्चा चालूच राहणार आहेत. विज्ञान आणि अध्यात्माला मानणारे उपासक लोकं पुनर्जन्माला आप आपल्या तऱ्हेने वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात....! अगदी स्पष्टच सांगायचे झाल्यास वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या व्यक्ती जास्तीत जास्तपणे पुनर्जन्माला फक्त एक आभासी संकल्पना म्हणून पाहतात. त्याला कारणही अगदी तसेच आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोन कुठल्याही बाबींसाठी शास्त्रीय पुराव्यांचा आधार मागत असतो. नेहमी आध्यात्म आणि विज्ञान ह्यामध्ये शीतयुद्ध ह्याचसाठी चालत असतात.
     पण मानवी मानवी आयुष्यात अश्या काही रहस्यमयी घटना घडून जातात ज्या पुनर्जन्म ह्या विषयावर आपणांस विचार करायला भाग पाडतात. आणि पुनर्जन्माच्या संकल्पनेला आधार म्हणून अशाच घटना एक सबळ आधार देखील ठराव्यात. कारण आध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या शीतयुद्धात नेहमीच वैज्ञानिक दृष्टीकोन काही अंशी माघारलेला असतो.
     विषयाच्या अनुषंगाने मला काही घटनांचा उल्लेख इथे करावासा वाटतो-

     १५ आगस्ट २००८ ह्या दुर्दैवी दिवशी माझ्या आईचा स्वर्गवास झाला. दुसऱ्या दिवशी १६ आगस्ट ला तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिच्या अंतिम संस्काराच्या आधीच आमच्या परिवारातील काही महिलांनी आईच्या तळपायावर आणि कंबरेवर काजळाचे ठळक ठिपके लावून तिला शेवटचा निरोप दिला होता. नेमका आईच्या जाण्याच्या दिवशीच आमच्या वाहिनीला दिवस थांबले....पुढे २७ एप्रिल २००९ रोजी, म्हणजे जवळ जवळ आठ महिन्यानंतर वहिनींनी एका गोंडस मुलीला जन्माला घातले. ‘अंजली’ तिचे नांव ! अंजली ह्या जगात येतानी सोबत तळपायावर आणि कंबरेवर नेमक्या त्याच ठिकाणी डाग घेऊन आली,जिथे आईला लावल्या गेले होते........आणि अजून एक विलक्षण प्रतिक्रिया म्हणजे- सामान्यतः नवजात बाळांना नजर आलेली नसते. ध्वनी च्या दिशेने पाहायची नैसर्गिक प्रतिभा त्यांच्यात नसते,मात्र जन्माच्या ठीक १५ मिनिटांना अंजली पहिल्यांदा आमच्या समोर आणल्या गेली तेव्हा ती नीटपणे मला आणि बाबूजींना न्याहाळीत होती. पुढे अंजलीचे जन्मडाग हळूहळू अदृश्य होत गेले.......! त्याहीपुढे अंजली २ वर्षाची असतांनी एके दिवशी बाबुजी शेतावरून घरी आले. घामाने डबडबलेले शरीर पाहून चिमुकली अंजली आत पळाली,आतून हातपंखा घेऊन आली आणि हातपंख्याने बाबूजींना वारा घालायला लागली. अगदी स्वप्रेरणेने तिची हि प्रतिक्रिया पाहून आम्हा सगळ्यांचेच उर दाटून आले.......२ वर्षाच्या चिमुकल्या बाळाला हे सर्व कळते म्हणजे अगदी नवलच म्हणायचे.....!
     ह्या घटना आईच्या पुनर्जन्माला नक्कीच पुरेश्या कारणीभूत वाटतात. म्हणूनच आम्ही छोट्या अंजलीला आईच्या रुपात पाहात असतो....असो.
     मला अजून एका दुसऱ्या घटनेचा बाबूजींचे एक मित्र श्री.सुभाष पाटील काकांचा उल्लेख करावासा वाटतो. दीर्घ आजाराने काकांचा २००४ मधे स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांच्या मृत्युपश्चात ८ वर्षानंतर ह्याचवर्षी म्हणजे २०१२ ला त्यांच्या स्नुषेला एक पुत्ररत्न प्राप्त झाले. काकांच्या मृत्युसमयी त्यांच्या भटजींनी सांगितले होते म्हणे कि काकांचा नक्कीच पुनर्जन्म होणार आहे. आणि एक विशेष योगायोगच म्हणा हवे तर, नवीन बाळाचा जन्म नेमका काकांच्या जन्माच्या तारखेलाच झाला....
     जगात अशा विविध आणि कैक घटना घडत असतात, त्या आधारावर असे म्हणण्याचे धैर्य नक्कीच होते कि होय, पुनर्जन्म हा होतोच! आपल्या बद्दल जरा आपण विचार केलाय का कधी आपण???? नक्की विचार करा......एखादया नवीन ठिकाणी आपण कधी जातो,ज्या ठिकाणी पूर्वी आपण कधीच गेलो नव्हतो. तिथे आपणांस कधी कधी सहज असे वाटून जाते कि अरेच्चा.... आपण तर हि गोष्ट पाहिलेली आहे.....असे वाटते कि,मी इथे कधीतरी येऊन गेलोय. कदाचित आपला सुप्त मेंदू आणि सदसद्विवेकबुद्धी आपल्याला त्या आठवणींची वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी आपल्यापर्यंत पोहोचवत असते. कदाचित कुठलीतरी अदृश्य शक्ती आपल्याला काही अबोल आणि अदृश्य आठवणींचा हवेसारखा एखादा झोका देऊन जातो.......काहीतरी विचित्रच घडत असते......नक्कीच असा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना येऊन जातो. कदाचित आपल्या पूर्वजन्माच्या वारंवारीताच असाव्यात ह्या !
     आता राहिला वैज्ञानिक आधाराचा प्रमाण तर अख्ख्या वैज्ञानिक आधार ह्या संकल्पनेलाच छेद देणारी घटना इथे नमूद करावीशी वाटते. आपण सहावे ज्ञानेंद्रिय(Sixth Sence) विषयी थोडेफार एकुण आहोत.ह्या संकल्पनेला छेद देण्यासाठी विज्ञान तयार होताच, नाही असे नाही. बस,रेल्वे आणि वर्दळीच्या ठिकाणी आपल्याला कुठला स्पर्श हेतुपरस्पर झाला आणि कुठला नकळत झाला हे स्त्रियांना बरोबर कळते. हि पारखी नजर स्त्री जातीला उपजतच मिळते. मात्र ह्या बाबीसाठी कारण काय हे विज्ञान अजूनही समजू शकलेलं नाही.......! तरीही म्हणून विज्ञान सहावे ज्ञानेंद्रिय ह्या संकल्पनेला मुळात मानतच नाही असे निदान आजपर्यंत तरी माझ्या ऐकिवात नाही. एकंदरीत विज्ञान आणि आध्यात्माच्या तुलेतील आध्यात्माचा पार्डाच जड आहे हे वारंवार सिध्द होते.

1 comment:

  1. प्रिय हमारीवाणी टीम. पहले तो आपका बहोत बहोत धन्यवाद जो आपने मेरे ब्लॉग को आपके मंच पर जोडणे कि कोशिश कि. मै जल्द हि नया कोड प्राप्त करके दोबारा अपने ब्लॉग पर आपका लोगो लगाने का प्रयास करता हू. आपका बहोत बहोत धन्यवाद.

    ReplyDelete